महिलांच्या सुरक्षितेसाठी नगरपालिका कटिबद्ध मात्र पोलिसांची उदासीनता
राजकीय दबावातून पोलिसांनी पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी....

संगमनेर ( प्रतिनिधी ) सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने संगमनेर नगर परिषदेने पोलिसांच्या मदतीकरता 200 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहे. हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असताना फक्त राजकीय दबावातून पोलिसांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपालिकेची कटिबद्धता मात्र पोलिसांची उदासीनता याची चर्चा संगमनेर शहर व तालुक्यामध्ये सुरू झाली आहे.
संगमनेर शहर हे आधुनिक व विकसित शहर म्हणून ओळखले जाते. संगमनेर शहरांमध्ये महिलांची सुरक्षितता अधिक चांगली व्हावी याकरता नगर परिषदेने अद्यावत असे दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले. राज्यामध्ये कुठेही नाही अशी आपत्ती निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
महिलांचा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व अद्यावत डिजिटल रूमचे लोकार्पण प्रसंगी पोलीस प्रशासनाचे अधिकारी हजर नसणे हा राजकीय दबावातून घडलेल्या प्रकार आहे की काय अशी चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाबाबत संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासन व मुख्याधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर, शहर पोलीस निरीक्षक यांना निमंत्रित केले होते. त्यांनी याबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मीटिंग असल्याचे सांगितले. मात्र वस्तूस्थिती खरी चौकशी केली असता अशी कोणत्याही प्रकारची मीटिंग नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अशा मुख्य कार्यक्रमाकडे न येणे हे न उलगडणारे कोडे ठरले आहे.
खरे तर नगर परिषदेने सुरक्षा रक्षक दल स्थापन करून पोलिसांना मदत केली आहे. त्याचबरोबर 200 सीसीटीव्ही कॅमेरा बरोबर 11 चौकांमध्ये स्पीकर व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून तातडीने सूचना देणे शक्य होणार आहे.
महिलांच्या अत्यंत सुरक्षिततेचा प्रश्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण आणि हा विषय पोलीस विभागाचा असताना फक्त राजकीय दबावातून पोलिसांनी पाठ फिरवल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासन सर्वसामान्यांसाठी आहे की सत्ताधारी पुढार्यांची मर्जी राखण्यासाठी आहे असा सवाल ही सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
पोलीस प्रशासनाबाबत नाराजी
सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षकांना निमंत्रण दिले होते का ? मग ते उपस्थित का राहिले नाहीत. शहराच्या सुरक्षेची संबंधित कार्यक्रमाला पोलीस निरीक्षकांनी उपस्थित राहणे औपचारिकता येत नाही तर त्यांची जबाबदारी आहे. निमंत्रण मिळाल्यानंतर ही जाऊ की जाऊ नये असा विचार पोलीस प्रशासनाने करणे कधीपासून सुरू झाले. निवडणूक झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीचे राजकारण कधीच केले नाही. शेवटी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचे काम आहे. अशा विषयात राजकारण करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.





