बळीराजाच्या शिवारात हिरवाई नांदो- आमदार खताळ
आषाढी एकादशीनिमित्त घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

संगमनेर :(सुदिन न्यूज नेटवर्क)
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि समाजाच्या सुख-समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. यंदा राज्यात भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यांची पिके जोमाने यावीत, प्रत्येकाच्या घरात आनंद, समाधान आणि भरभराट नांदावी तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमदार खताळ यांनी संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच वाघापूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून राज्याच्या प्रगतीसह शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि सर्व समाजबांधवांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठलनामाचा गजर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. आमदार खताळ यांनीही भाविकांशी संवाद साधत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, आषाढी एकादशी हा भक्ती, सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा अत्यंत पवित्र दिवस आहे. संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात बंधुभाव, सद्भावना आणि सेवाभाव वृद्धिंगत व्हावा, हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस पडून बळीराजाच्या आशा पूर्ण व्हाव्यात, शेतकऱ्यांच्या शिवारात हिरवाई बहरावी, प्रत्येक कुटुंब सुखी, समाधानी आणि समृद्ध व्हावे, तसेच सर्वांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि भरभराट नांदावी, अशी प्रार्थना श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी केली आहे.
