सैनिक स्मारकासाठी २० लाखांचा निधी देणार- आमदार अमोल खताळ
कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा गौरव


संगमनेर : ( सुदिन न्यूज नेटवर्क)
“मी केवळ बोलणारा नाही, तर कृतीतून काम करणारा आहे. सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. सैनिक स्मारकासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर स्मारक उभारणीसाठी माझ्याकडून २० लाख रुपयांच्या निधीची सुरुवात करण्यात येईल,” अशी घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.
कारगिल विजय दिनानिमित्त मालपाणी लॉन्स येथे तालुक्यातील माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने कारगिल विजय रॅली, शौर्यगाथा, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, वृक्षारोपण तसेच वीर नारी आणि वीर मातांचा सन्मान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. त्यानंतर विविधस्पर्धांतील विजेत्यांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक भानुदास पोखरकर अध्यक्ष प्रकाश कोटकर उपाध्यक्ष कॅप्टन सुभाष कुडेकर कार्याध्यक्ष सुनील थोरात सचिव प्रवीण गुंजाळ कारगिल योद्धा लक्ष्मण ढोले भारत कुटे गिरीश एरंडे कुंडलिक कर्पे आनंदा गीते यांच्या सह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार खताळ म्हणाले की, स्वराज्य सैनिक कल्याण संस्था केवळ माजी सैनिकांपुरती मर्यादित न राहता समाजसेवेचेही मोलाचे कार्य करीत आहे. माजी सैनिकांनी सेवेत असताना ज्या समर्पणाने देशसेवा केली, त्याच भावनेने सेवानिवृत्तीनंतर ही समाजसेवेचे व्रत जपले आहे. उणे १० ते १५ अंश तापमानात भारतीय जवानांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या. कारगिल युद्धात ५२७ जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळेच आज देश सुरक्षित असून नागरिक शांततेत जीवन जगत आहेत. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय असून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सुख-दुःखात समाजाने सहभागी व्हावे व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वर्गीय जाधव यांच्यासारखे अनेक शूर सैनिक या भूमीत घडल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कार्यक्रमास तालुक्यातील माजी सैनिक, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जगातील विविध ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारतीय सैन्याने देशाच्या सीमा भक्कमपणे सुरक्षित ठेवल्या. त्यामुळे कोणत्याही देशाची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.


