तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या खात्यावर १० कोटींचा लाभ

संगमनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जानेवारी २०२५पासून आजपर्यंत तब्बल ८ हजार ५९५ बांधकाम कामगारांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मंजूर झालेल्या या प्रस्तावांनुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १० कोटी १६ लाख ७३ हजार २८० रुपये इतकी रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे, त्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कामगारांची नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, प्रस्ताव दाखल करणे तसेच प्रस्तावांच्या मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असून, अधिकाधिक कामगारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल करावेत. बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाच्या माध्यमा तून विविध योजना राबविण्यात येत आहेत.शिक्षणासाठी मदत,सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य तसेच कुटुंबीयांच्या गरजा लक्षात घेऊन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिला जात आहे.
तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा झाल्याने त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी नोंदणीपासून ते प्रस्ताव मंजूर होऊन लाभाची रक्कम खात्यावर जमा होईपर्यंतच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे. अधिकाधिक कामगारांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मदत केली जात आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहे
‘एकही पात्र कामगार योजनेपासून वंचित राहू नये’
बांधकाम कामगार हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हात, पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीत मेहनत करून ते शहरांसह ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान देतात. त्यांच्या कष्टाला शासनाच्या कल्याणकारी योजनांची साथ मिळणे आवश्यक आहे. तालुक्यातील एकही पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. जानेवारी २०२५पासून ८ हजार ५९५ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थ्यांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख ७३ हजार २८० रुपये जमा झाले आहेत. ही संख्या केवळ आकडेवारी नसून, हजारो कामगार कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे भविष्यातही पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”— अमोल खताळ, आमदार




