कर्जमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल; ६६ हजार शेतकऱ्यांना ६२७ कोटींचा दिलासा
६२७.४७ कोटी रुपये शासनाकडून अहमदनगर जिल्हा बँकेकडे जमा....

अहिल्यानगर :(सुदिन न्यूज नेटवर्क)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला जिल्ह्यात वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमधील १,३६६ सोसायट्यांचे थकबाकीदार असलेल्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांच्या कर्जापोटी ६२७.४७ कोटी रुपये शासनाकडून जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेच्या प्रशासक संगीता डोंगरे यांनी दिली.
शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीतील ९ लाख १६ हजार ५१२ कर्जदार सभासदांपैकी १ लाख ५ हजार ३२८ सभासदांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर ११ हजार २८४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. पीक कर्जासाठी आवश्यक असलेला प्री-स्टॅम्प फार्म आयडी नसणे, परगावी किंवा स्थलांतरित असणे, तसेच बायोमेट्रिक प्रमाणीकरण न होणे आदी कारणांमुळे काही शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे.
ज्या शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकते, त्यासाठी संबंधित बँक व संस्थांमार्फत पाठपुरावा करून प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली
आहे. तसेच पात्र सभासदांपैकी मृत कर्जदारांच्या कर्जाची वारस नोंद करण्याची प्रक्रिया संबंधित वारसांकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पातळीवर पूर्ण करून घेण्याच्या सूचना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, आधार प्रमाणीकरणाच्या बाबतीत अहिल्यानगर जिल्हा आघाडीवर असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सचिव, त्यांच्या यंत्रणा आणि बँक कर्मचारी तसेच तालुका सहनिबंधक व लेखापरीक्षक यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
बँकेचे प्रशासक डोंगरे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे तसेच सहकार विभाग, जिल्हा लेखापरीक्षक कार्यालय आणि जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.





